पुणे गँगवॉर! मी माझ्याच नातवाला का संपवू?; बंडू आंदेकरचा कोर्टात सवाल, वाचा A टू Z युक्तिवाद

Edited by: चेतन पाटील•Authored by: अभिजित दराडे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Sept 2025, 10:57 pm

Pune Gangwar Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सहाही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपी बंडू आंदेकर याने आपली बाडू मांडली. आपल्याला या प्रकरणात गोवलं गेलं आहे. आपण हत्येच्या दिवशी केरळमध्ये होतो. आपला आणि या हत्येच्या घटनेशी काहीच संबंध नाही, असं बंडू आंदेकर म्हणाला. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला.
अभिजीत दराडे, पुणे : आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. या सहाही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर बंडू आंदेकरच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा बंडू आंदेकर याने यावेळी केला. बंडू आंदेकरच्या वकिलांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला. अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सहाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाने आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बंडू आंदेकर कोर्टात काय म्हणाला?
यावेळी बंडू आंदेकरने कोर्टात आपली भूमिका मांडली. “आम्हाला खोट्या गुन्ह्यात गुंतवलं आहे. आम्ही केरळला होतो. आमची पोलिसांच्या विरोधात काही तक्रार नाही. पण आम्हाला अडकवलं गेलं आहे”, असं बंडू आंदेकर कोर्टात न्यायाधीशांसमोर म्हणाला. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात अतिशय महत्त्वाची माहिती दिली.
तपास अधिकारी काय म्हणाले?
“एकूण 13 जणांनी कट रचला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. आम्हाला पिस्तूल जप्त करायची आहे. पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहेत. त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे. त्यांना शोधायचं आहे”, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
“सखोल तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड याच्या घराची देखील रेकी केली होती. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. आंदेकर टोळीने हा खून केला आहे. आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड याच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ओळख परेड घ्यायची आहे”, असं तपास अधिकारी म्हणाले.
“या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका-एका आरोपीवर 3-3 किंवा 2-2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहेत. हे टोळी युद्ध आहे. कट रचत खून केला आहे”, असा मोठा दावा तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवादावेळी केला.
सरकारी वकील काय म्हणाले?
“प्रत्यक्षदर्शंनी दोन आरोपींना ओळखलं आहे. ते दोन आरोपी अंदेकर टोळीसाठी काम करत होते. या सगळ्यांनी संगणमताने कट रचून हत्या केली. आम्हाला सगळी चौकशी करायची आहे. पिस्तूल ताब्यात घ्यायचे आहेत. पिस्तूल कुठुन आणलं हे तपासायचं आहे. आरोपींचे कपडे शोधायचे आहेत. एकूण १६ मुद्दे आहेत ज्यावर तपास करायचा आहे. आम्हाला चौकशीसाठी वेळ मिळाला नाही”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
आरोपींच्या वकिलांचा (बंडू आंदेकर आणि परिवार) युक्तिवाद काय?
“आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहोत. जी FIR झाली ती चुकीची आहे. कल्याणी माझी मुलगी आहे जिने फिर्याद दिली. जो मयत झाला तो नातू आहे. आमची नावे का आली? गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्यादी आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणीने देखील कट रचला होता. तिच्या घरचे यात अटक झाले आहेत, अशी बंडू आंदेकरचीबाजू वकिलांनी मांडली.
“मी माझ्या नातूचा खून का करू? मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर प्रतिस्पर्धीला मारेन. वनराचे खूप फॉलोअर्स आहेत. तो लोकप्रिय होता. त्यापैकी कुणी मारलं असेल. त्याचे खूप फॅन आहेत”, असं बंडू आंदेकर कोर्टात म्हणाला.
“मी फिर्यादीच्या पतीचे, साऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतले आहे म्हणून माझं नाव यात गोवलं गेलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हेच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे”, असंही बंडू आंदेकर कोर्टात म्हणाला.
“दत्ता काळे याने माझ नाव घेतलं नाही. आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं. आमच्याकडून काय रिकव्हर करायचं आहे? आम्ही राज्यात नव्हतो. आम्ही केरळमध्ये होतो. आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही. पिस्तूल माझ्याकडून कशी जप्त करायची आहे?”, असा सवाल बंडू आंदेकरने केली. तसेच “वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर अटक केली आहे, लेडीज ऑफिसर नव्हते तरीही अटक केली आहे”, अशी तक्रारदेखील आरोपींच्या वकिलांनी यावेळी कोर्टात केली.
‘यांचं टोळीयुद्ध’, सरकारी वकिलांचा युक्तिवाद
“घटना ५ तारखेला घडली आहे. FIR ही 6 तारखेला झाली आहे. घरगुती वाद आहेत हे मान्य आहे. आरोपीच्या मुलाचा खून झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा खून झाला. यांचं टोळीयुद्ध आहे. हे सुरूच असतं. आरोपींची चौकशी एकत्रित करणं गरजेचं आहे. यात अजून कोण कोण आरोपी आहेत ते पाहणं गरजेचं आहे”, असं सरकारी वकील म्हणाले.
 

Author

Leave a Comment