उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी अशी लढत होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएला बहुमत आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांचं मताधिक्क्य नेमकं किती असणार याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं सुप्त संघर्ष सुरु आहे. शिंदे यांचे मंत्री आणि आमदार वारंवार अडचणीत येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ७ ऑगस्टला दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी आपले उत्तम संबंध असल्याचा मेसेज या भेटीगाठींमधून शिंदे यांनी भाजपच्याच राज्यातील नेतृत्त्वाला दिला. कारण राज्यातील भाजपकडून शिंदेसेनेच्या कोंडीचे प्रयत्न सातत्यानं सुरु आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बहुतांश खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे यांनी भाजपच्या नेतृत्त्वाकडे भेटीगाठीत केल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. लोकसभेत उद्धव ठाकरेंचे ९ खासदार आहेत. यातील ६ खासदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत. हे खासदार आज होत असलेल्या मतदानात एनडीएच्या उमेदवाराला मतदान करु शकतात. तसं झाल्यास तो ठाकरेसेना आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हिप चालत नाही. खासदारांनी त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीला अनुसरुन मतदान करणं अपेक्षित असतं. त्यामुळे खासदारांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यातच गोपनीय मतदान असल्यानं क्रॉस व्होटिंग करताना कोणतीही अडचण नसेल. सरकारकडून मतदारसंघाकडून काय मिळेल, याचा विचार करुनही खासदार वेगळा विचार करु शकतात.
ठाकरेसेनेच्याखासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांचं मताधिक्क्य वाढेल. दुसऱ्या आघाडी किंवा युतीच्या उमेदवाराला मतदान करताना काही सांकेतिक भाषा एकमेकांना सांगितल्या जातात आणि त्यावर राजकीय पक्ष विश्वास ठेवत असतात. त्यामुळे शिंदे आज कमाल करणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
ठाकरेसेनेच्या खासदारांची मतं फोडून शिंदे काय साधणार?राज्यात महायुती २.० सरकार आल्यापासून, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची सातत्यानं कोंडी केली जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठाकरेंची मतं फोडून शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला आपलं उपयोगमूल्य पुन्हा दाखवून देऊ शकतात. राज्यात भाजपचे लोकसभेचे ९ खासदार आहेत. तर शिंदेसेनेचे ७ खासदार आहेत. पण ठाकरेंचे ६ खासदार मतदानानेळी फुटल्यास एनडीएच्या उमेदवाराची मतं वाढतील. राज्यातून शिंदेंनी भाजपपेक्षा अधिकची मतं एनडीएच्या उमेदवाराला मिळवून दिली, असा त्याचा अर्थ असेल.
फडणवीसांना त्यांच्याच स्टाईलनं मेसेजदेवाभाऊ कॅम्पेनच्या माध्यमातून राज्यभरात सध्या फडणवीसांची हवा आहे. २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फडणवीस यांनी महाविकास आघाडीची मतं फोडली होती. त्यातूनच पुढे शिवसेना फुटली. आता फडणवीस यांच्या स्टाईलनं प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरेंची मतं फोडत शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांना अप्रत्यक्ष मेसेज देऊ शकतात.
ठाकरेसेना-भाजपच्या जवळिकीला ब्रेकस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेसेना, भाजपची जवळीक वाढली आहे. ही जवळीक शिंदे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आज शिंदे यांनी ठाकरेसेनेची मतं फोडल्यास हा प्रकार भाजपच्याच मदतीनं झाल्याचा संदेश ठाकरेंना जाईल. त्यामुळे ते भाजपपासून अंतर राखतील. याचा थेट फायदा शिंदेंना होईल.