Manoj Jarange Mumbai Protest Updates : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत मागणी मान्य न झाल्यास शनिवार-रविवारपर्यंत मुंबईत मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसंच आम्ही आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण नोंदवत काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दिलेले नियम डावलण्यात आल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार घेत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “आमची मागणी मान्य केली नाही तर शनिवारी आणि रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येतील आणि मग सोमवारचं आंदोलन छान होईल,” असा सूचक इशारा जरांगे यांनी दिला आहे.
सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोर्टाने आदेश दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच्या गाड्या लगेच हटवल्या आहेत. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. परंतु मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा शासन निर्णय जारी करा. फडणवीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. ते कोर्टाकडे चुकीची माहिती देतात. पण आम्ही आझाद मैदानातून हटणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.आरक्षणाचा निकाल काय लागेल, हे काळ सांगेल, पण…; अमित ठाकरेंनी भूमिका घेतली, मराठा आंदोलनाबद्दल म्हणाले…
“आमची सरकारसोबत चर्चेची पहिल्या दिवसापासून तयारी आहे. सरकारमधून चर्चेसाठी 30-35 मंत्री येवो नाही तर दोन मंत्री येवो, आम्हाला आरक्षणाशी देणंघेणं आहे. हैदराबाद, सातारा, औंध आणि बॉम्बे गव्हरमेंटच्या गॅझेटियरची अंमलबजावणी करा, अशी आमची मागणी आहे. यातील औंध आणि बॉम्बे गव्हरमेंटच्या गॅझेटियरच्या अभ्यासासाठी आम्हाला आणखी काही वेळ लागेल, असं शिंदे समितीचं म्हणणं आहे. पण हैदराबाद आणि सातारा संस्थानची तात्काळी अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे,” असं जरांगे यांनी सांगितलं आहे.
आंदोलकांना विनंती
“जे कधीही रद्द होणार नाही, पिढ्यान् पिढ्या टिकेल, असं आरक्षण मला माझ्या समाजाला द्यायचं आहे. मी बरोबर करतो, फक्त पोरांना तुम्ही शांत राहा. मला किंवा माझ्या समाजाला डाग लागेल, मान खाली घालावी लागेल, असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, तुम्ही शांत राहा,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.