Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा घेऊन त्यांच्या भेटीला गेलं होतं. या शिष्टमंडळाला अखेर मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यात यश आलं आहे.
मुंबई :मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर पाचव्या दिवशी उपोषण सोडलं आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जूस पिवून उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पण त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानेच घेतल्याचं सांगितलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
मनोज जरांगे पाटील भावूक
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं तेव्हा आझाद मैदानादातील वातावरण अत्यंत जल्लोषाचं होतं. संपूर्ण मैदानात गुलाल उधळला जात होता. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. जरांगे यावेळी प्रचंड भावूक झाले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांचं यावेळी अभिनंदन केलं. आंदोलकांकडूनही मनोज जरांगे यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्यासह मुंबईत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. दक्षिण मुंबईतील रस्ते आंदोलकांनी व्यापलेले होते. दक्षिण मुंबईतल्या गल्लोगल्लीत आंदोलक पोहोचले होते. आंदोलकांमधील जवळपास सर्वाधिक जण हे पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबई नवी होती. आंदोलकांचे सुरुवातीचे दोन दिवस पावसामुळे खूप हाल झाले. पण आंदोलक जरांगेंसोबत परिस्थितीला तोंड देत राहिले. अखेर त्यांचा हा संघर्ष वाया गेला नाही. सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
“आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील कुठल्याही वंचित घटकावर अन्याय करणार नाही. मराठा समाजातील वंचित घटकावर अन्याय करणार नाही. पण याचं राजकारण महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. त्याला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राच्या बाकीच्या घटकांवर अन्याय होणार नाही ही देखील आमची भूमिका होती. आज मनोज जरांगे यांचं समाधान झाल्याने त्यांनी आंदोलक मागे घेतलं आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.