मुंबई : महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या त्यांच्याच पक्षातील या हीन दर्जाच्या लोकांना भाजप बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे, असा सवाल उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला.
पहलगाम दहशवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, येथे मनसेचे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारत मारहाण करीत आहेत, असे वक्तव्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही मराठी जनतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘हिंदी भाषकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्राही वाघ असतो,’ अशी पोस्ट दुबे यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट करीत टीका केली आहे. महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा सनदशीर मार्गाने जिंकू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
‘महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा’
पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या ‘प्लेबूक’ जाळ्यात अडकू. हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा, हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजकीय घडामोडींवर कोणतेही भाष्य नको-राज ठाकरे
मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर आता युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींवर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर भाष्य करू नये, अशी तंबी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्याचे कळते.